Type Here to Get Search Results !

बोधकथा :- कर्तव्यनिष्ठा

                



                 आजची बोधकथा

                   कर्तव्यनिष्ठता


*एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले. त्यांनी शाप दिला पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणीही केली.

   पृथ्वीवर सर्वदूर हाहाऽऽकार माजला. सर्वजण हताश झाले. १२ वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मनुष्य , प्राणी दुष्काळाने मरणार या विचाराने सर्व जण घाबरून गेले.

   एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा. थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला. शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले.

    एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता. त्या पिलांनी मोराला विचारले, "जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा ?"

    मोर म्हणाला, "आपण जर आता पासून नाचणे किंवा नाच* शिकणे बंद केले तर जेंव्हा १२ वर्षांनी पाऊस पडू लागेल तेंव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलेलो असु".

    शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला. तो धावतच घरी* आला, शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला.आणि कोरडे शेत नांगरु लागला, व मुलांना शेतीची कामे शिकवू लागला.

     मुले चकित होऊन बापाकडे पहात होती. त्यांनी त्याला विचारले, "बाबा जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा ?"

 शेतकरी म्हणाला,

"आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली, तर १२ वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ. आणि पुनः कामला लागला.

    इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचंबित झाला.

      तो एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले, "तु आकाशवाणी ऐकली नाहीस का ?"

       शेतकरी म्हणाला,

"होय ऐकली...पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाहीत... तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच कामे करता येणार नाहीत. मग जेंव्हा पाऊस पडेल तेंव्हा ते उपाशी राहतील."

     हे ऐकून इंद्र सुन्न झाला.

स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि...,जर मी १२ वर्षे पाऊस पाडला नाही तर... मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन. मग सर्व सृष्टी करपुन जाईल, जैव सृष्टी नष्ट होईल.

    देवाने लगेचच विचार बदलला. आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली.


                

तात्पर्य---

बाह्य परिस्थिती कशीही असो...! आपण न चुकता आपले कर्तव्य  करीत राहायला हवं...! कठीण परिस्थिती मधेच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.