हा कसला नैवेद्य !
बोधकथा
चंपारण्य गावात सकाळपासन मोठी लगबग सुरु होती. आज देवीला एका धष्टपुष्ट बोकडाचा बळी देण्यात येणार होता. मग गावकऱ्यांनी भलामोठा पुष्पहार त्या बोकडाच्या गळ्यात अडकवला आणि त्याची मिरवणूक काढली. ही मिरवणूक निघाली तेव्हा योगायोगाने गांधी जींनी त्या गावात प्रवेश केला. एवढी मोठी मिरवणूक पाहून त्यांनी कुतूहलानं त्या मिरवणूकीबद्दल गावकऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा गावकरी म्हणाले, ही बोकडाची मिरवणूक आहे. "पण बोकडाची मिरवणूक का काढताय ?" गांधीजींनी विचारलं. "कारण आम्हांला हा बोकड देवीला नैवेद्य म्हणून बळी द्यायचाय, गावकरी उत्तरले. "पण बोकडाचा बळी का द्यायचा?" "कारण आम्हांला देवीला प्रसन्न करायचंय." "बोकडापेक्षा माणूस श्रेष्ठ असतो ना ?"होय, गांधीजी. "मग माणसाचा बळी दिल्यावर देवी जास्त प्रसन्न होईल ना! त्यासाठी तुमच्यापैकी कुणीतरी बळी जायला हवं. कोण तयार आहे. सांगा तुमच्यापैकी ? कुणीच तयार नसेल तर मी तयार आहे. "सगळे गोंधळात पडले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. मग गांधीजी म्हणाले, "मुक्या प्राण्यांच्या हत्येनं देवी खूष होत नाही. उलट सर्व प्राणीपात्रांवर दया दाखविल्याने ती प्रसन्न होते. असं माझं म्हणणं आहे." या शब्दांनी सगळ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांनी बोकडाला सोडून दिलं. त्यानंतर कधीही त्या गावच्या देवीला बोकडाचा नैवेद्य देण्यात आला नाही.
तात्पर्य :
१) वैज्ञानिक दृष्टी महत्वाची.
२) माणसाने आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी.
x
